जंतर-मंतरवर NEET पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचे शांततापूर्ण आंदोलन; लोकशाही मार्गाने न्यायाची मागणी
नवी दिल्ली | प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थी, पालक आणि विविध विद्यार्थी संघटनांनी शांततापूर्ण आंदोलन केले. हातात फलक घेऊन आणि घोषणाबाजी करत आंदोलकांनी परीक्षेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
आंदोलनकर्त्यांनी लोकशाहीच्या चौकटीत राहून आपला निषेध नोंदवला. देशाच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आणि लोकशाही पद्धतीने आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला असून, त्याच अधिकाराचा वापर करत विद्यार्थ्यांनी आपल्या भावना आणि मागण्या सरकारसमोर मांडल्या. मात्र, पोलिसांनी लोकशाही मार्गाने आंदोलन न हाताळता विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला आणि यात मुली आणि मुलांना जखमी केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
https://youtube.com/shorts/JQ7TSGnKkzQ
विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर परिणाम झाला असून, या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याची मागणीही करण्यात आली.




